Breaking News
मुंबई : एका मद्यधुंद कारचालक महिलेने तिघांना उडवल्याची धक्कादायक घटना चेंबुरमध्ये काल (ता. 28 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास घडली. चेंबूरच्या डायमंड गार्डनजवळ हा अपघात झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सदर मद्यधुंद कारचालक महिला ही मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात येत असताना हा सगळा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर महिलेवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर घटनेतील तिघांना तत्काळ रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या या तिघांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हेही वाचा – केरळमध्ये हाय अलर्ट
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथे वास्तव्यास असलेली एक महिला मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत तिची कार चालवत मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात जात होती. यावेळी सदर महिला कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता वेगात कार चालवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे. याचवेळी या महिलेची कार डायमंड गार्डनजवळ आली असता महिलेचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तिने समोरून स्कूटीवरून येणाऱ्या जैस्वाल कुटुंबाला उडवले. यावेळी त्या दुचाकीवर असलेले हर्ष जैस्वाल, समृद्धी जैस्वाल, दिपू जैस्वाल हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर तिन्ही जखमींना तत्काळ जवळील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर महिलेला स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
सदर महिला ही व्यवसायाने आक्रिटेक असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी संतप्त होत महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळी दाखल होत नागरिकांना महिलेला मारण्यापासून रोखले. या घटनेनंतर रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारचालक महिलेला ताब्यात घेतले. चेंबूर परिसरात झालेला अपघात हा चिंतेची बाब ठरत आहे. चौकात झालेल्या अपघातामुळे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for The Global Times
The Global Times